स्वच्छता, हायजीन आणि अतिरेक!

मी जेवत खाताना हात धुवत नाही। एकदमच काही चिखलातले किंवा केमिकल/ग्रीस संबंधी काही काम केले असेल तरच हात धुतो। अगदी साबण लावून। नाहीतर साधे पाण्याने देखील नाही। माझा अत्यंत पक्का समज आहे की दिवसभर इकडे तिकडे वावरत असताना आपल्या हातांवर विविध प्रकारच्या बॅक्टरीया चे सुंदर कल्चर डेव्हलप होत असते। ह्यातले 90% हुन जास्त आपल्या शरीरासाठी उपकारक असतात। इम्युनिती वाढवतात। पचन सुधारतात… इ इ.. त्यांना धुवून घालवणे म्हणजे चूक, साबण म्हणजे तर खूनच!

मला हॅन्डग्लोज घालून बिसलेरी पाण्यातील पाणीपुरी देणारा भय्या आणि ते खाणारे लोक ह्यांचा प्रचंड तिटकारा आहे। ह्या लोकांनी खरेतर हॉस्पिटल मध्येच जगायला पाहिजे…

एक गंमत : फार पूर्वी मी एकदा रायगडावर गेलो होतो। ही इतकी जुनी गोष्ट की जेव्हा मी चपळ होतो, पोट सुटलेले नव्हते आणि मी ट्रेक करू शकायचो। हसू नका, ही सत्यघटना आहे। एकेकाळी मी खरेच हिरो फिगर होतो। तर त्या कालची ही गोष्ट। मला आठवते तेव्हा भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान ची स्थापना केली होती आणि त्यांचा एक मोठा ग्रुप तेव्हा रायगडावर आला होता। आणि आम्ही संघवाले होतो। नीटसे आठवत नाही पण त्या वेळेस काही इंटर्नल खुन्नस पण होती… तर दुपारच्या वेळेस आम्ही जेवायला बसलो। कुणीतरी झुणका भाकरीचा बेत केला होता। एक पान, त्यावर भाकर आणि वर झुणका, बरोबर एक कांदा। एक हातात घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने खायचे। मी एक तर खादाड आणि मला असे वरवर खायला जमत नाही। तर तेव्हा तिकडचा एक कार्यकर्ता म्हणाला चल रे बसून खाऊ.. मी तर जणू वाटच पहात होतो। आम्ही दोघे बसलो। आणि 7–8 जण बसले पटापट। आणि भाकऱ्या समोर ठेवल्या, नमस्कार करायला, वदनी कवळ म्हणायला। आणि जोरदार वारा आला। समोर चा सिन : हिरवे पान, त्यावर गोरीपान भाकर, त्यावर पिवलंधम्मक पिठलं आणि वर लाल मातीचा पात्तळ थर.. च्यायला.. हे लफडेच झाले। म्हटले दुसरी भाकर-पिठलं घेऊया। तर बरोबरचा मित्र म्हणाला, “काय रे मावळ्या, राजांच्या काळात मावळे कसे खात असतील। अरे ही रायगडाची माती। चव तर बघ। आजार चढणार नाही। चढला तर स्वराज्याचा ज्वर चढेल”.. त्या दिवशीपासून ह्या मातीशी आणि त्यातल्या बॅक्टरीयाशी छान मैत्री झाली। ती आज तागायत आहे। स्वराज्याचा ज्वर काही नाही चढला, पण कधी आजारी देखील पडलो नाही…

Leave a Reply